सोयाबीनसह इतर कृषी उत्पादनांच्या वायदेबंदीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बुलढाणा : केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल. हरभरा, मुंग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदेबाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याने, सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात बुलडाण्यातील चिखली रोडवर वायदेबंदीच्या आदेशाची होळीकरून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

केंद्र सरकारचा हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे. इतर राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्राने हा निर्णय घेतला आहे. शहरी ग्राहकांना स्वस्तात शेतमाल व अन्नधान्य मिळाले पाहिजे या हेतूने केंद्र सरकारने सेबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे.

या निर्णयाचा शेतकऱ्यांवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावा. वायदेबाजारात सट्टेबाजांचाच फायदा होतो व त्यात अजून अनेक त्रुटी आहेत म्हणून वायदेबाजारातील काही बाबींना शिस्त लावणे व सुधारणा करणे गरजेचे आहे असेही रविकांत तुपकर म्हणाले. या निर्णयाच्या बाबतीत फेरविचार न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही तुपकरांनी दिला.