पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडगिरी सुरू, भाजप जशास तसं उत्तर देणार – फडणवीस   

मुंबई – राज्यात कायदा सुव्यस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी काल अटक केली आहे. दरम्यान, त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya)  यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

खार पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला भाजपा नेते किरीट सोमय्या भेटायला आले असता शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या हे पोलीस ठाण्याबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चपलांचा मारा केला. तसेच, दगडही गाडीवर मारण्यात आले. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून सोमय्या यात जखमी झाले आहेत.

दरम्यान,  किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरू असून लोकशाही पायाखाली घातली जात आहे. याला भाजप जशास तसं उत्तर देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. रविवारी आपण गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुडंगिरी चालली आहे. मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायाखाली घातली जात आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पण त्याचे उल्लंघन करुन नवनीत राणा यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं गेलं. या संबंधी आपण उद्या राज्याच्या गृहसचिवांची भेट घेणार आहोत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारख्या वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी आपण करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही, जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे तात्काळ बंद नाही झालं तर आम्ही आक्रमक भूमिका घेणार. एका महिलेला हे सरकार घाबरलं आणि आख्खी मुंबई वेठीस धरण्याचं काम राज्य सरकारनं केलं. जे यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम करत आहेत त्यांना हे जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत.