महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गाड्यांचे ताफे अडवायला आम्हाला वेळ लागणार नाही – पाटील

मुंबई – राज्यात कायदा सुव्यस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी काल अटक केली आहे. दरम्यान, त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

खार पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला भाजपा नेते किरीट सोमय्या भेटायला आले असता शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या हे पोलीस ठाण्याबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चपलांचा मारा केला. तसेच, दगडही गाडीवर मारण्यात आले. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून सोमय्या यात जखमी झाले आहेत.

शिवसेनेच्या या भ्याड हल्ल्यावर आता भाजपकडून टीका केली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते किरीटसोमय्या व मोहित कंबोज यांच्यावरील भ्याड हल्याचा जाहीर निषेध.महविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी असेल नामर्दांगीचे खेळ त्वरित थांबवले नाहीत तर भारतीय जनता युवा मोर्चा ला ही ‘अरे’ ला ‘का रे’ करता येते हे त्यांनी लक्षात ठेवावे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गाड्यांचे ताफे अडवायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि जर यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला तर याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन राहील हे ही यांनी लक्षात ठेवावे.वेळीच स्वतः ला आवर घाला! हा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देत आहे.