सरकारने ‘उमेद’च्या मोर्चाला सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात:- नाना पटोले

मुंबई- ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

विधानसभेत ‘उमेद’च्या मोर्चाचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून दररोज मोठा पाऊस पडत आहे आणि भर पावसातही सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानात मोर्चे येत आहेत. मोर्चे हे सरकारचे अपयश असते, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजही आझाद मैदानात विविध संघटनांचे मोर्चे आलेले आहे, त्यांना सोयी सुविधा नाहीत. ‘उमेद’च्या मोर्चातही लाखो महिलांचा सहभाग आहे. कोविडच्या काळातील थांबवण्यात आलेले पैसे द्यावेत, मानधन वाढवूण देणे यासारख्या मागण्या आहेत. सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे पटोले म्हणाले.