The Kerala Story खोटी म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर; ‘त्या’ 26 पीडितांना आणलं माध्यमांसमोर
‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटातून मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचा दावा काही राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळे काही राजकीय पक्षांनी केरळमधील 32,000 महिलांना इस्लाम धर्म स्वीकारून ISIS मध्ये भरती केल्याच्या चित्रपट निर्मात्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच बुधवारी ‘द केरळ स्टोरी’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह (Vipul Shah) यांनी मुंबईत ISIS मध्ये सामील होण्यासाठी कथितरित्या प्रवृत्त झालेल्या अशा 26 पीडितांना मीडियासमोर आणले आहे. यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने त्यांना मदत म्हणून 50 लाखांचा धनादेशही सुपूर्द केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह म्हणाले, ‘आमच्या चित्रपटाला प्रोपोगंडा म्हटले होते, त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या आरोपांना न जुमानता आम्ही जे काही बोललो ते खरे आहे. चित्रपटाचे जे व्हायचे ते होईल, पण आमचे ध्येय आता मुलींना वाचवणे आहे. आम्ही आमच्या चित्रपटातील तीन स्त्री पात्रांच्या माध्यमातून 32 हजार महिलांची कहाणी सांगितली. या नंबरवर लोकांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.’
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Director Sudipto Sen) म्हणाले की, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही जाती-धर्माविरोधात नसून दहशतवादाच्या विरोधात बोलले गेले आहे. दहशतवादाला जात आणि धर्म नसतो. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी पत्रकार परिषदेत सुदिप्तो सेन यांचा मुद्दा पुढे करताना सांगितले की, ‘प्रत्येक चित्रपटात काही खलनायक वेगळ्या जाती-धर्माचा असतो, याचा अर्थ त्या जाती-धर्मातील सर्व लोक खलनायक असतात असे नाही. शोलेमध्ये गब्बर सिंग हा खलनायक होता, याचा अर्थ संपूर्ण सिंग समाज खलनायक झाला असे नाही.’
आपला मुद्दा पुढे करत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, ‘दहशतवाद केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असे म्हटले जाते, पण दुर्दैवाने केरळचा प्रश्न आला की लगेच लोक धर्माबद्दल बोलायला लागतात. मला वाटते की या चित्रपटाने खरोखरच इस्लाम धर्माच्या लोकांची सेवा केली आहे कारण या धर्माचा गैरवापर होत आहे. आपण धोक्यात आहोत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने चित्रपट पाहावा.’