मंत्रिमंडळात वर्णी लागलेले आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी  जाऊन दर्शन घेतले आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“शिवसेनाप्रमुख आमच्या ह्रदयात आहेत. शपथ घेताना लिहून दिलं आहे त्याप्रमाणेच वाचावं अशी सूचना असल्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं नव्हतं. पण ते आमच्या मनात, ह्रदयात कायम आहेत,” असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी सांगितलं. “बाळासाहेबांची शिकवण आहे त्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचा आम्ही अवलंब करु,” असं दादा भुसे (Dada Bhuse) यांनी म्हटलं.