५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोनं-चांदी, हिरे …, जालन्यात सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड

जालना : जालन्यात इनकम टॅक्स (Jalna News) विभागाने आठ दिवस सलग केलेली छापेमारी राज्याच चर्चेचा विषय ठरतेय. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती.

विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास १३ तास रोख रक्कम मोजत होते.जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती. छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे.

दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे. रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईच सहभागी झाले होते.दरम्यान आता करण्यात आलेल्या कारवाईनंतर आयकर विभागाकडून पुढील चौकशी करत अटकेची कारवाई केली जाण्याचीही शक्यता. याप्रकरणी पुढे आणखी काय खुलासे होतात? त्यांनी इतकं मोठं काळंधन कसं जमवलं, याचा आता तपास केला जाणार आहे. त्यातूनही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.