एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे – संजय राऊत 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

दरम्यान,  शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरात म्हटलं आहे. राऊत लिहितात, एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटना ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रिपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे शिंदे यांनीच उघड केले.