उद्या नागपुरात होणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे समापन

नागपूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन उद्या मंगळवार 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री  नितीन  गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते  सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी (ता.3) सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कृष्णाजी खोपडे, प्रा. संजय भेंडे, माजी नगरसेवक संदीप जाधव, ऍड. धर्मपाल मेश्राम, चंदन  गोस्वामी, सुरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णाजी खोपडे, माजी आमदार प्रा. अनिलजी सोले, नरेंद्रजी (बाल्या) बोरकर, मंडळ अध्यक्ष संजयजी अवचट यांच्या नेतृत्वात, उत्तर नागपूरमधून प्रा. संजयजी भेंडे, माजी आमदार मिलिंदजी माने, मंडळ अध्यक्ष संजयजी चौधरी यांच्या नेतृत्वात तर पश्चिम नागपुरातून माजी आमदार सुधाकरजी देशमुख, संजयजी बंगाले, मंडळ अध्यक्ष विनोदजी कन्हेरे यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम नागपुरातून शहराध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके, मंडळ अध्यक्ष किशोरजी वानखेडे यांच्या नेतृत्वात, दक्षिण नागपुरातून आमदार मोहनजी मते, भोजराजजी डुंबे, मंडळ अध्यक्ष देवेंद्रजी दस्तुरे यांच्या नेतृत्वात, मध्य नागपुरातून आमदार विकासजी कुंभारे, माजी आमदार गिरीशजी व्यास, माजी महापौर दयाशंकरजी तिवारी, किशोरजी पालांदूरकर यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात येणार आहे. उपरोक्त मान्यवरांच्या नेतृत्वात सर्व यात्रा सायंकाळी 7 वाजता शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होतील.

यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते  सुधांशू  त्रिवेदी यांचे प्रमुख वक्ते म्हणून भाषण होईल. यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील संबोधन होईल.