शिंदे गटातील ‘तो’ मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; खैरेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Political crises – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत (Uday Samant) हे सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

उदय सामंत हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण, उदय सामंत हे सर्वात शेवटी शिंदे गटात गेले होते. त्यामुळे १६ अपात्र आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील अनेक आमदार फुटणार आहेत. ते पु्न्हा आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल, हे माहिती नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.