अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते – ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते असेही ठाकरे म्हणाले.

माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले.