आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हासडून टाकू; मुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांची टीका

Khed – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हासडून टाकू, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले,  काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

“राजन साळवी, अनिल परब हे काय देशद्रोही आहेत का? १९९२-९३ ला जेव्हा मुंबईत सगळं पेटलं होतं. त्यावेळी अनिल परबांसारखे सगळे शिवसैनिक तिकडे होते. ते शिवसैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला