वेदांता प्रकल्प जाणे हे पाप शिंदे – फडणवीस सरकारचे – जयंत पाटील

नांदेड – वेदांता प्रकल्प इतर राज्यात गेल्याने अनेक तरुणांना नोकरीला मुकावे लागले आहे. हे पाप शिंदे – फडणवीस सरकारचे आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नांदेड येथे केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काल (सोमवारी) परभणी (Parbhani) जिल्हा केल्यानंतर आज हिंगोली आणि नांदेड (Hingoli and Nanded) जिल्हयाची आढावा बैठक घेतली.

आघाडी सरकारबद्दल जे राजकारण शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis government) केले ते सर्वसामान्य जनतेला पटलेले नाही. त्यांच्या विषयी जनतेत रोष आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत ते असमाधानी आहेत. त्यांचे त्यांना माहिती नाही की आपण कधीही अपात्र ठरू. जे लोक पक्षांतर करून जातात त्यांच्यापेक्षा  सामान्य सैन्य महत्त्वाचे आहे.  त्यांचे बळकटीकरण झाले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपण मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली तर भविष्यात नांदेड जिल्ह्याला विशेष ताकद दिली जाईल. पक्षातंर्गत निवडणुकीत स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन सर्वमान्य अध्यक्ष निवडले जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ज्याला पक्षात स्थान मिळवायचे असेल त्यांनी सभासद नोंदणी केली पाहिजे. काम करणार्‍या व्यक्तीला आभाळ हे ठेंगणे असते. योग्य माणसांना संधी देण्याचे काम प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस  नक्कीच करेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी दिला. यावेळी माजी खासदार कमलकिशोर कदम आणि माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी आपले विचार मांडताना कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांचे विचार, पक्षवाढीसाठी सदैव तत्पर असले पाहिजे असे स्पष्ट केले.

यावेळी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी खासदार कमलकिशोर कदम, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर,माजी आमदार शंकरराव धोंडगे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहमद खान पठाण, निरीक्षक आशा भिसे, युवक अध्यक्ष रौफ जमिनदार, सुनील कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजल रावणगावकर, माजी आमदार प्रदिप नाईक, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, प्रशांत कदम, नितीन वाघमारे, युवती जिल्हाध्यक्षा प्रियांका कैवारे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख, कन्हैया कदम, आदी उपस्थित होते.