‘आमच्याकडे रिपोर्ट आला आहे, पहिल्याच फेरीमध्ये भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील’

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena, Bharatiya Janata Party, Congress and NCP) असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने (MVA) एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच राज्यसभेला भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआला आम्ही चितपट करू असा चंग देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बांधला आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या सामन्यासाठी विशेष तयारीनिशी सज्ज झाली आहे.

दरम्यान, मागील वेळी राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) त्यांनी जी चूक केली तीच खेळी आम्ही आता खेळणार असा त्यांचा गैरसमज आहे. बाजीगार हा बाजीगार असतो. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये पाचही उमेदवार निवडून येतील, असा दावा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आमच्याकडे रिपोर्ट हातात आला आहे, त्यानुसार आमचे पाचही उमेदवार सहज निवडून येतील. पुढे काय काय होतं हे पाहाच, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला. भाजप हा नेतृत्व शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या मनात अजिबात शंका नाही.असं ते म्हणाले.