नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु – पवार

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशी हाक दिली.

आज चर्चा आहे कुणासोबत किती आमदार आहेत याची. आमदार आणता येतात. गेले त्यांची चिंता करू नका ते सुखाने राहू देत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सामुहिक शक्तीतून नक्की नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.