छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारण कशासाठी? – मनसे

मुंबई – सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी  केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे नेते राजू पाटील यांनी केलेले एक ट्वीट मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.

राजू पाटील यांनी ट्वीट केलं असून सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे असा सल्ला दिला आहे. तसंच राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारण कशासाठी? अशी विचारणा केली आहे.