चंद्रकांत पाटलांवर हायकमांड नाराज; वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अमित शहांचे स्पष्ट निर्देश

पुणे – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी बाबरी पाडण्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता असं वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव देखील केली मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचे हायकमांड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) तीव्र नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.

दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, आशिष शेलार (Ashish Shelar) काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे-शरद पवार भेट, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

येणाऱ्या काळात निवडणुका आहेत. तत्त्पूर्वी भाजप नेत्यांकडून अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचने केलेल्या कामांवर पाणी फेरले जात आहे. हेच पाहून अशी वक्तव्ये टाळण्याची सक्त ताकीद दिली. तसेच फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्याच कामावर बोलावे असे स्पष्ट निर्देशही अमित शहा यांनी दिल्याचे समजते.