मंगळसूत्र गळ्यात घातलं की पतीने गळा पकडलाय असं वाटतं – अमृता फडणवीस 

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकारण, गायन आणि सामाजिक विषय अशा सर्वच विषयांमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेली वक्तव्यं ही चर्चेचा विषय ठरतात. अमृता यांनी नुकतीच ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अमृता फडणवीस यांनीही आपल्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत उत्तरे देत जोरदार बॅटिंग केली.

या  कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर फारच खुमासदारपणे दिलं. “तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?”, असा प्रश्न अमृता यांना विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय असं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असं मला वाटतं. असे उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. त्यावर, उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या संकल्पनेला दाद दिली.

दरम्यान, ‘ज्यावेळी लोक मामी या नावाने हाक मारतात त्यावेळी नेमकं कसं वाटतं’, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी मामी म्हटल्यावर, खरं सांगू का.. मला मज्जा येते असं हटके उत्तर त्यांनी दिली.