भरगोस उत्पादनासाठी सरळ व संयुक्त खतातून पिकांना संतुलित प्रमाणात खत द्या

लातूर :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत्‍ मृद आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी नत्र- कमी, स्फुरद – मध्यम आणि पालाश- भरपूर अशी आहे. त्यानुसार या रब्बी हंगामात हरभरा, करडई व रब्बी ज्वारीच्या भरगोस उत्पादनासाठी संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय गवसाने यांनी केले आहे.

जमिन आरोग्य पत्रिका अभियान अंतर्गत दुसऱ्या चक्रानुसार (सायकल) च्या नुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हयातील शासकीय जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळे मार्फत जिल्हयातील 943 ग्रामपंचायत मध्ये मृद परीक्षण अहवालानुसार सुपिकता निर्देशांक फलक तयार करुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत लावण्यात आले आसून, त्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत गावनिहाय सुपिकता निर्देशांकानुसार खताचा पिकनिहाय वापर या बद्दल पेरणी पूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यात बाजारात उपलब्ध्‍ असलेल्या खताच्या अनुषंगाने सरळ व संयुक्त खताचा वापर करुन खताच्या खर्चात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा 1356 हेक्टर, करडई 450 हेक्टर व रब्बी ज्वारी 1140 हेक्टरवर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मृद परिक्षण अहवालनुसार संतुलित खताचा वापर करुन उत्पादन वाढीचे लक्षांक साध्य करण्यात येणार आहे.