अशोक चव्हाण यांनी पोलिसी बळाचा वापर करीत समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला – संभाजीराजे

मुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकानी आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. अशोक चव्हाण यांच्या ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी समाजाच्या मागण्यांसाठी निदर्शनं केली. यावेळी या समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा व्हिडिओ पोस्ट करत छत्रपती संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांद्वारे अशोक चव्हाण व राज्य सरकारला खडा सवाल केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये संभाजीराजे म्हणतात की, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी मराठा समन्वयक त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले असताना ना. चव्हाण यांनी त्यांची भेट घेण्याचे व निवेदन स्वीकारण्याचे नाकारले.

यावर नाराजी व्यक्त करण्यासाठी व चव्हाण यांच्यापर्यंत समाजाचा आवाज पोहोचविण्यासाठी या समन्वयकांनी त्याठिकाणी संविधानिक मार्गाने निदर्शन केले. मात्र चव्हाण यांनी त्याकडेही दुर्लक्ष करून पोलिसी बळाचा वापर करीत समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे आपली जबाबदारी झटकून, शांततेच्या मार्गाने समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या बांधवांना अशी वागणूक देणे, हे कितपत योग्य आहे ? असा सवाल करीत छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकरणाचा विचार उपसमितीचे अध्यक्ष म्हणून ना. चव्हाण यांच्याबरोबरच राज्य सरकारने देखील करावा, असे स्पष्ट मत मांडले आहे.