भाजपा विरोधात बोलणा-यांना ईडीची भिती दाखवले जाते – बाळासाहेब थोरात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची काल सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात (PMLA Court) 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ३ मार्च म्हणजेच 8 दिवसांची ED कोठडी सुनावण्यात आली आहे. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलिक यांना घरचं जेवण घेण्याची परवागनी देण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याठिकाणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित आहेत. याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही लोकांना मुद्दाम त्रास देण्यात येतोय, कारण कोणीही विरोधात बोललं की त्याला अटकाव केल्याचं देशात पाहायला मिळतंय. या यंत्रणा दुसरीकडे वापरायच्या असतात. परंतु भाजपाकडून चुकीचा वापर होतोय. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तिथं भाजप सरकार त्रास देत असल्याचं दिसतंय असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.