निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता – पवार  

राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचा पवारांचा दावा

पुणे – रशिया  आणि युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. मात्र भारतात जवळपास १२० दिवसांपासून तेलाच्या किंमती स्थिर आहेत… त्यामुळे होणाऱ्या तेल कंपनींच्या नुकसान भरपाईसाठी १२ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे गरजेचं आहे असा दावा आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात केला आहे. यामुळे ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२  रुपयांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या तुलनेत अनेक राज्यात पेट्रोल स्वस्त असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल.

लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा. जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. राज्यानेही दर कमी करावेत, असं काहीजण म्हणतील, त्यांची भूमिका चुकीची नसली तरी राज्याची आजची बिकट आर्थिक स्थिती व केंद्र सरकारकडं अडकलेला हक्काचा GST चा मोठ्या प्रमाणातील निधी याचा विचार करता, आज ते शक्य होईल, असं मलातरी वाटंत नाही. असं ते म्हणाले.