सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत- चंद्रशेखर बावनकुळे

सामनातील आजचा अग्रलेख भाजपला चांगलाच झोंबला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्टिटवरुन काय निशाणा साधलाय. अहंकाराच्या नशेत झिंगून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्रजींच्या विरोधात गरळ ओकली.२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम ‘ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.