शिवसेनेने शब्द पाळला; कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला 

कोल्हापूर –  कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) yयांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला  आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.

दरम्यान, कडवे शिवसैनिक काँग्रेसला मतदान करतील का, असा प्रश्न होता. मात्र शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी आपला शब्द पाळला.  सिद्धार्थ नगर, खोलखंडोबा, बुधवार तालीम, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका परिसरात राजेश क्षीरसागर यांचा उत्तम प्रभाव आहे. या ठिकाणी जयश्री जाधवांना आघाडी मिळाल्याचं आकडेवारी सांगते.

सिद्धार्थनगर, पंचगंगा तालीम, खोल खंडोबा परिसरातून जयश्री जाधव यांना ३ हजार ७८८ मतं मिळाली. तर सत्यजीत कदम यांना २ हजार ५६ मतं मिळाली. अकबर मोहल्ला, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, तोरसकर चौक भागातून जाधव यांना ३ हजार ७५६ इतकं मतदान झालं. तर कदमांना २ हजार ६६९ मतं मिळाली.