मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नका; सरकारने तत्काळ संभाजीराजेंचे उपोषण सोडवावे’

मुंबई – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत.  खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, केवळ आणि केवळ नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालविणार्‍या महाविकास आघाडी सरकारने विविध मागण्यांबाबत आतातरी गंभीर व्हावे.युवराज संभाजीराजे छत्रपती यांना अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. त्यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो.

महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे ! अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.