मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट; अमृता फडणविसांच्या वक्तव्याची राज्यभर चर्चा

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमृता फडणीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत (Mumbai Traffic) एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय.

मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केला. मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते, असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.

मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.