उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावं – गुलाबराव पाटील

जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, आमदार गुलाबराव पाटील (Gulab Patil) जळगावात (Jalgaon) पोहोचले त्यानंतर त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.