‘रामाचं मंदिर असो, CAA-NRC असो किंवा जम्मू काश्मीरचा मुद्दा असो काँग्रेसची भूमिका फक्त विरोधकाची होती’

अहमदाबाद – अनेक दिवसांपासून काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेले गुजरातचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, मी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. अशा स्थितीत हार्दिकचा राजीनामा ही काँग्रेससाठी वाईट बातमी आहे. गुजरात काँग्रेसमधील कलह थांबण्याचे नाव घेत नाहीये.हार्दिक पटेलच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे तो पक्षावर नाराज असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. यानंतर आता पक्षांतर्गत सर्व काही मिटले असून, हार्दिकची नाराजी दूर झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र चिंतन शिबिरात सहभागी न झाल्याने हार्दिकने पुन्हा एकदा पक्षाप्रती नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी बुधवारी पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यातही त्यांनी हार्दिक पटेल यांची वैयक्तिक भेट घेतली नव्हती.

हार्दिक पटेल म्हणाले,  गेल्या तीन वर्षांत मला असं लक्षात आलं आहे की काँग्रेस पक्ष फक्त विरोधाचं राजकारण करत आहे. मात्र लोकांना फक्त विरोधक नाही तर एक सक्षम पर्याय हवा आहे. अयोध्येत रामाचं मंदिर असो, CAA-NRC असो किंवा जम्मू काश्मीरचा मुद्दा असो देशाला या समस्येचं निराकरण हवं होतं. काँग्रेस पक्ष यात फक्त अडवणूक करत होता. गुजरात असो किंवा पटेल समाज असो काँग्रेसची भूमिका फक्त विरोधकाची होती. जनतेच्या भविष्यासाठी कोणताही रोडमॅप तयार न केल्यामुळे प्रत्येक राज्यात जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे.

काँग्रेस पक्षाने युवकांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाबरोबर यायची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे मी मोठ्या हिमतीने काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचा माझे सहकारी आणि जनता स्वागत करतील असा मला विश्वास आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाचा मी कायम ऋणी राहीन.असं देखील त्यांनी म्हटले आहे.