उद्धव ठाकरेंनी बोलावले तर मातोश्रीवर जाऊ – संतोष बांगर

हिंगोली – शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी (MLA)बंड करत राज्यातील सत्तांतर घडवले असून  महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट असे सरकार आहे.

दरम्यान, एका बाजूला या घटना घडत असताना आमदार संतोष बांगर (Santosh Bagar)हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता याच संतोष बांगर यांनी महत्वाचे एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मातोश्रीवर आम्हाला सन्मानपूर्वक बोलवलं तर आम्ही मातोश्रीवर जायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नकार देणार नाहीत. हे राजकारण आहे. राजकारणात काही होऊ शकतं. मातोश्री वरून मोदीजी यांना फोन केला तर आणि भाजप शिवसेनेची युती पुन्हा झाली तर प्रत्येक शिवसैनिकाला आनंद होईल, असे ते म्हणाले आहेत. 

आजही आमचा आदर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याबाबत आहे. मातोश्रीवर आमचं प्रेम अद्याप कायम आहे. जर काही लोक मातोश्रीवर चिखलफेक करत असतील तर आमचे मुख्यमंत्री देखील शांत बसणार नाहीत, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही सूचक इशारा दिला आहे. तसेच शिवसैनिक आणि आमदार, पदाधिकारी पेटून उठतील असेही बांगर म्हणाले आहेत.