आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्या वतीने जयंत पाटील व अजित पवार यांचा सत्कार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद कुलकर्णी यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाराष्ट्रात प्रत्येक समाजात आर्थिक आणि दुर्बल घटक असतात. त्यांना अनंत अडचणींना तोंड देत काम करावे लागते. समाजातील अशा व्यक्तींना उभारी देणे हे समाजसुधारणेचे काम आहे. ही शिकवण आदरणीय शरद पवार यांनी आम्हाला दिली आहे असे जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

समाजातील वेगवेगळ्या वर्गाने ज्या-ज्या वेळी आरक्षणाची मागणी केली त्यावेळी पवारसाहेब आवर्जून सोबत उभे राहिले. त्याचप्रमाणे ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी मकरंद कुलकर्णी यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुविधा मिळाव्यात हा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ ब्राम्हण समाजासाठी नसून सर्व समाजासाठींचा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांच्या माध्यमातून समाजातील शोषित वर्गाला निधी देण्याचे काम झाले. अजितदादांनी मंजूर केलेल्या पन्नास कोटींच्या निधीचा फायदा खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना झाला आहे. सत्तेत असताना लोकांकडून सत्कार होत असतात, मात्र महाविकास आघाडी सरकार जाऊन नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटला असला तरी केलेल्या कामांचे समाधान व्यक्त करण्यासाठी सर्व लोक एकत्र आले, याबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

जनआशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे, ही शिकवण आदरणीय शरद पवारसाहेबांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील सर्व घटकांना सोबत नेण्याचा प्रयत्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित काम करताना सारथी, बार्टी, महाज्योती अशा विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

महापुरुषांनी कधीही कोणत्याही जाती-धर्माबद्दल आकसाची भावना ठेवली नाही. हीच शिकवण आपण पुढे नेली पाहिजे. एखादे काम करताना त्यात सातत्य टिकले पाहिजे. जोवर आपण हाती घेतलेल्या कामात यश संपादित करत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तीन पक्ष काम करत होते. हा सत्कार कोणाचा वैयक्तिक नसून सामुदायिक सत्कार आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेचे विजय जमदग्नी, गजानन जोशी, बाळासाहेब पांडे, मनोज गाजरे, प्रदिप अष्टेकर, स्वानंद गोसावी, यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.