शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीला पहिला धक्का, जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा दिला राजीनामा

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता राष्ट्रवादीत राजीमान्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे.

“आदरणीय पवार साहेब नेहमी म्हणतात की,”लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो. मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना.हीच खरी लोकशाही आहे..!”

“असं असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.लोकशाहीत विश्वास ठेवणारे पवार साहेब असा निर्णय घेवूच कसा शकतात.हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं..? राज्यात आणि देशात सध्या ज्या प्रकारच वातावरण आहे त्यात आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय कसे लढू शकतो..आम्हाला त्यांची गरज आहे.”

आणि म्हणूनच मी जितेंद्र आव्हाड,पवार साहेबांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे.माझ्यासहित ठाण्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत,” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.