साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला; आव्हाडांची वळसे पाटलांवर टीका

Dilip Valase Patil – शांत आणि संयमी स्वभाव अशी ओळख असणाऱ्या राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची चिरफाड केली. आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच दिलीप वळसे पाटील यांनी चढवला आहे.

रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, हि टीका शरद पवार यांच्या गटाला चांगलीच झोंबली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वळसे-पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, दिलीप वळसे-पाटील यांचा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याचे आश्चर्य वाटते.

साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. दिलीप वळसे-पाटील बाजूच्या मतदार संघात आमदारही नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण आदरणीय साहेबांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल.असा पलटवार आव्हाड यांनी केला आहे.