‘पाकिस्तान जिंदाबादच्या’ घोषणा देणाऱ्या देशविघातक प्रवृत्तीवर देशद्रोही कलमांतर्गत कारवाई करा – साळी 

पुणे – पुण्यातील पीएफआय च्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होत असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता युवसेना सुद्धा आक्रमक झाली असून युवसेनेचे सचिव किरण साळी (Kiran sali) यांनी ‘पाकिस्तान जिंदाबादच्या’ घोषणा देणाऱ्या देशविघातक प्रवृत्तीवर देशद्रोही कलमांतर्गत कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

या पत्रात ते म्हणतात,  मुघलांच्या जुलमी राजवटीपासून रयतेला मुक्त करत स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या वंदनीय छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात, पाकिस्तान धार्जिणे समाजकंटक ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा-ए-तकबीर आणि  अल्लाह-हू-अकबर’ची घोषणा देतात. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी राज्यात हा प्रकार घडावा हे दुर्दैव आहे.

देशविघातक प्रवृत्तीने पछाडलेल्या या समाजकंटकांना वेळीच  ठेचले नाही तर हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. शिवरायांचा स्वाभिमान आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादाचे पाईक असणाऱ्या महाराष्ट्रावर वाकडी नजर टाकण्याचेही कुणाचे धारिष्ट होऊ नये अशी कठोर कारवाई करून ही देशविघातक वृत्ती समूळ नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या राज्याच्या, देशाच्या सुरक्षेसाठी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचे कलम लावून कठोरात कठोर कारवाई करून यानंतर कुणी स्वप्नात सुद्धा देशविरोधी विचार करता कामा नये, असा धडा शिकविला जावा ही नम्र विनंती. अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत या देशद्रोह्यांना त्यांची जागा दाखविण्याची धमक आमच्या रक्तात आहे.असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.