राज्यसभेसाठी एमआयएमचा चक्क महाविकास आघाडीला पाठिंबा

 Mumbai – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी तर भारतीय जनता पार्टीने पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. परंतु महाविकास आघाडीला मत देताना त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत.

भाजपचा पराभव करण्यासाठी आमचा पक्षाने (AIMIM) महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय/वैचारिक मतभेद मात्र कायम राहतील.धुळे आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी आम्ही काही अटी घातल्या आहेत. तसंच एमपीएससीमध्ये (MPSC) अल्पसंख्याक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणीही केली. याशिवाय मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितलं आहे. आम्ही त्यांना आमच्या शुभेच्छा देतो! असं जलील यांनी म्हटले आहे.