नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

मुंबई  – उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल दिल्या. उल्हास नदीच्या परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.

बैठकीला जलसंपदा सचिव बसवंत स्वामी, कल्याण – डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी ( दूरदृश्यप्रणालीव्दारे ), ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (दूरदृश्यप्रणालीव्दारे) उपस्थित होते.मंत्री जयंत पाटील यांनी कल्याण – डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण निश्चित करावी. अशा बांधकामांना नोटीस बजावण्यात यावी. ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी. उल्हास नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने मदत केली जाईल. नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या.

एनआरसी कंपनीने या परिसरात उभारलेला बंधारा जीर्ण झाला असून त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर हा बंधारा संपादीत करुन घ्यावा आणि त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात यावी, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली.

यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय टाटू, पर्यावरण विभागाचे उपसचिव अभय पिंपरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव पी. के. मिराशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, शहर अभियंता सपना कोळी आदी उपस्थित होते.