विशेष सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल करण्याचं ठिकाण – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या 20 ते 25 वेब सीरीज होतील असाही टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्र रचल्याचे स्टिंग ॲापरेशन विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट विधीमंडळात सादर करण्यात आले आहे. हे तब्ब्ल सव्वाशे तासाचं रेकॅार्डिंग आहे. या स्टिंग ॲापरेशन मधून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचं सभागृहात अक्षरशः वस्रहरण केलं आहे. आता या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्ह देखील सुपूर्द केला.

“देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सकाकडून वाढला आहे. सरकारच षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.