पूर्वीसारखी केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला मोदी सरकारकडून मदत होत नाही; राष्ट्रवादीचे रडगाणे सुरूच

मुंबई – ज्या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून किंवा त्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्‍याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

ज्या केंद्रसरकारच्या योजना आहेत, त्यामध्ये केंद्राचा आणि राज्यात एकूण केंद्राचा मोठा हिस्सा असायला हवा मात्र सध्या काही तसे दिसत नाही. तसेच पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तोटा मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांच्या खिशाला बसत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

इंधनावरील कर कमी करणे, आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणे हे मोदी सरकारने काम केले तर त्यांचे कौतुक होऊ शकते मात्र एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका समोर ठेवून जाहीर केले जाईल आणि जे शेतकरी मधल्या काळात विरोधात गेले आहेत त्यांना भाजप चुचकारण्याचा प्रयत्न करेल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमाला विरोध होणे स्वाभाविक आहे. विविध मान्यवरांनी या आधीच त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी २०१७ साली या चित्रपटात भूमिका केली होती. त्यावेळेस ते राजकारणात कार्यरत नव्हते. त्याबद्दल त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन आत्मक्लेशसुद्धा केला आहे असे मतही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.