मोदींचा खरा चेहरा जनतेला कळाला, मोदी ना हिंदूंचे, ना मुस्लीमांचे, ना देशाचे :- नाना पटोले

मुंबई- केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लीमांचे, ना देशाचे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जनतेने भाजपाला केंद्रात दोनदा बहुमताने सत्ता दिली पण भाजपाने जनतेला काय दिले, याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने ६० वर्षात काय केले सांगण्यासाठी भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर देशात काहीही नव्हते, सुईपासून रॉकेटपर्यंत काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचे शिखर गाठले, भारताला जगात महासत्ता बनवले. काँग्रेस सरकारांनी विकासच केला नसता तर नरेंद्र मोदी आज जी देशाची संपत्ती विकत आहेत ती कुठून आली असती. काँग्रेसविरोधात सातत्याने थोतांड मांडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत ते त्यांनी आता थांबवावे. नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन ९ वर्ष झाली, तुम्ही देशासाठी काय केले? हे सांगण्याची वेळ आहे, ते तुम्ही सांगा.

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षांच्या राज्य सरकारांचा कारभार पहावा. कर्नाटकात मुख्यंमत्रीपदासाठी २५०० कोटी रुपयांचा लिलाव केला…मंत्रीपदासाठी कोट्यवधी रुपयांचा लिलाव झाला होता हे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनीच सांगितले आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशनचे सरकार आहे, त्याचे उत्तर आधी नरेंद्र मोदींनी द्यावे. काँग्रेसवर आरोप करून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकत नाही. तुमच्या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर जनतेला द्या. काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु असे जर तुम्हाला वाटत असेल तर जनतेला तुमचा खरा चेहरा समजलेला आहे हे लक्षात ठेवा.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा सरु आहे त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल. काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत, आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगू. सध्या राज्यातील जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे, शेतकऱ्यांचे अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झाले आहे, महागाई आहे, बारसू प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे. खारघरमध्ये सरकारी कार्यक्रमात हत्याकांड झाले, त्यावर सरकार लपवाछपवी करत आहे. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. बाकीच्या चर्चांमध्ये आम्हाला रस नाही, असेही नाना पटोले म्हणाले.