संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईत कार्यक्रम होऊ देणार नाही- नाना पटोले

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्या कथेपूर्वी गदारोळ निर्माण झाला आहे. १८-१९ मार्च रोजी मुंबईत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईतील कार्यक्रम आयोजित करू नये, असे म्हटले आहे.

संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून धीरेंद्र शास्त्री यांनी लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये, असे ट्विट काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. मीरा रोड येथे धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास लोकांची दिशाभूल केली जाऊ शकते आणि त्यांच्या भावना आणि विश्वासाशी खेळता येईल, असेही त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘ बागेश्वर महाराज यांचे कार्यक्रम मुंबईत होत असतील तर त्याला आमचा विरोध असणार आहे. कारण याच ढोंगी बाबाने जगात श्रेष्ठ तुकोबा महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे या ढोंगी बाबाला कुणी समर्थन करत असेल तर ते फार चुकीचं आहे. बागेश्वर धाम महाराजांचे कोणतेच कार्यक्रम आम्ही मुंबईत होऊ देणार नाही त्याला आमचा विरोध असेल.’