“गुंडगिरी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत, उद्धव ठाकरेंनी त्याची चिंता करू नये.”

mumbai- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे-पवार यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर टीका केली. यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ते भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे हा दगाबाज माणूस आहे. तो कुणाचंही भलं करू शकत नाही. घुसून मारण्याची भाषा त्यानं करू नये. मातोश्री सुरक्षित आहे का? तुम्हाला तरी मातोश्रीचे दरवाजे माहीत आहेत का? बाळासाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वानं उद्धव ठाकरेंना सुरक्षित करून ठेवलं. पण उद्धव ठाकरेंनी आदित्यला असुरक्षित केलंय. सगळ्यांशी दुश्मनी करून ठेवलीय. उद्धव ठाकरे यांची मातोश्री १ आणि मातोश्री २ अधिकृत आहे का? आमचे अधिकारी ते तपासतीलच, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

गुंडगिरी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्याची चिंता करू नये. त्यांनी मातोश्री १ आणि मातोश्री २ ची चिंता करावी मोले घातले रडाया.. अशी उद्धव ठाकरेंची गत आहे. असा माणूस जन्माला येईल हे बहुतेक त्यावेळी तुकाराम महाराजांना कळलं असेल. म्हणून त्यांनी या ओळी लिहून ठेवल्या असतील, असा घणाघातही नारायण राणेंनी यावेळी केला.