चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हे देखील मुंबईकरच – देवेंद्र फडणवीस

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त(Cancer) रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीसांनी हे विधान केले. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे उद्घाटन त्यांनी केले.

मुंबईत टाटा कॅन्सर रूग्णालय(Tata Cancer Hospital) येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल तसेच दिलासाही मिळेल. आपल्या वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की म्हणाले की मी अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबु आरएन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असेही फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’ ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर  चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विषेश म्हणजे  उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळणार आहेत.

संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, संघाकडून नव्याने बांधण्यात आलेला विवाहगृह  एमएमआर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या उत्तर भारतीय कुटुंबांसाठी परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच संघाचे सामूहिक विवाह समारोह आयोजित करण्याची योजना आहे. यामध्ये 8 उत्तर भारतीय जोड्या असतील तर दोन मराठी जोड्या असतील.