…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात साप सोडू; पँथर्स आर्मी आक्रमक 

Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी होत आहे. यातच आता दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापूर्वी पँथर्स आर्मीने (Panthers Army) हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी केली असून मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे.

पँथर्स आर्मीकडून पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं औरंगाबाद विमानतळास तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे नाव देण्याच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र शासन दरबारी याची कोणतीही दखल घेतली जात नाही असा आरोप पँथर्स आर्मीकडून करण्यात आला.

याशिवाय जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ अजिंठा लेणीकडे जाताना हर्सूल टी पॉईंट येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसविण्याबाबत पँथर्स आर्मीच्या वतीनं शासनाकडे मागणी करण्यात येत आहे. पण याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारनं आमच्या या मागणीचा प्राधान्यानं विचार करून तातडीनं हर्सूल टी पॉईंट येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत पँथर्स आर्मीच्या वतीने देण्यात आला.