‘तुमचे निर्बंध घाला चुलीत… येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच’

मुंबई – शनिवार, 2 एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा (Gudhi Padwa) साजरा होत असताना त्यावर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांची सध्या बरीच चर्चा आहे. याच मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला असून हिंदू सणांवर निर्बंध घालू नका, तुमचे निर्बंध घाला चुलीत असं म्हणत भाजप आमदार राम कदमांनी (Ram Kadam) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलं आहे.

कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे गाडी रुळावर आलीय. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करत आहेत. लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत, असं कदमांनी पत्रात म्हटलं आहे.

आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठावूक आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारनं शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले. पोलीस केस करू अशा धमक्या दिल्या. काय झालं सरकारला आमच्या विरोधासमोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागले.

त्यांनी म्हटलं आहे की, सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत कि ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण बघवत नाहीत. हिंदू सण आले कि त्यांना निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी (Anti Hindu) महाराष्ट्राच्या भूमीत ठेचून काढावेच लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी (Ram Navami) याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल कि तुमचे निर्बंध गेले चुलीत, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

आम्ही आमचा गुढी पाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच. राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कोणतेही हिंदू सणांवरील निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.