“राज की बात आता समोर येईलच, निम्म्या फेऱ्यांनंतर चित्र…”, राहुल कलाटेंचं सूचक विधान

आज सकाळीपासूनच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

चिंचवडमध्ये पहिल्या फेरीपासूनच स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आघाडीवर असून सातव्या फेरीअखेर त्यांनी ही आघाडी कायम ठेवली आहे. सातव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना ३८८८ मते मिळाली असून त्या ७८० मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे नाना काटे यांना ३१०८ आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १०९८ मते मिळाली आहेत. अश्विनी जगताप यांच्याकडे सातव्या फेरीनंतर एकूण ४०९१ मतांची आघाडी आहे.

अशातच राहुल कलाटेंनी (Rahul Kalate) सूचक विधान केले आहे. राज की बात आता समोर येईलच. राजकारणात आजची गोष्ट उद्या उघड होतेच. दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आणि आपापसातील वाद हे प्रकार होत होते. जनता त्यांच्या पैशाला भीक न घालता माझ्याकडे चांगला पर्याय म्हणून पाहतील असं वाटत होतं. निम्म्या फेऱ्या झाल्यानंतर चित्र लक्षात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.