“अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

रत्नागिरी –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी विविध पदाधिकारी आणि नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असून त्यांना काही कानमंत्रही दिले आहेत.कुणी तुमच्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या. त्यांनी हात उचलला तर तुमच्याकडूनही हात उचललाच पाहिजे. मी वकिलांची फौज उभी करतो, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

मुंबईत गेल्यावर माझ्या काही बैठका होतील. पक्ष जितका घट्ट बांधता येईल, तितका घट्ट बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो. लवकरच तुमच्यापर्यंत काही कार्यक्रम येतील, हे कार्यक्रम राबवत असताना कुणाचीही पर्वा करू नका. कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या. मी वकिलांची फौज उभी करेन. हे मी तुम्हाला मुद्दामहून आताच सांगतोय,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “समोरचे जसे वागतील, तसंच आपण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपल्याकडूनही हातच उचलला गेला पाहिजे. आणखी ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मी उघडपणे बोलू शकत नाही. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत बोलेन.”