मी अखेरपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही पण… – रामदास कदम

मुंबई : माझी बाजू महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी, मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ते किती चुकीचं आहे, मला राजकीय दृष्ट्या उद्धवस्त करणारं हे सांगण्यासाठी माझी बाजू मांडणार आहे. जी तथाकित ऑडिओ क्लिप आली त्यात मी शिवसेना, शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी पक्षाला हानी होईल असं मी काहीही बोललो नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांना जे पत्र दिलं होत त्याची प्रत मी आपल्यासमोर देत आहे. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून काही मत मांडली होती. मी शिवसेना प्रमुखांसमोर मी मतं मांडली आहेत. असा खुलासा शिवसेनेचे बडे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडलाय. तालुकाप्रमुखांची नावं माहिती नाहीत. अनिल परब यांच्या हॉटेल यांच्या विरोधात बोलणं मी पक्षाविरोधात बोलणं आहे का?, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत होता तो त्यांनी पाडला. वैयक्तिक संपत्ती पाडली तरी पक्षाविरोधात कसा काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला.

दुसरीकडे, मी अखेरपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही पण माझी मुलं निर्णय घेण्यास मोकळे आहेत असं देखील रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. हा भगवा झेंडा फक्त शिवसेनेचा असेल भाजपचा नाही अस देखील रामदास कदम म्हणाले आहेत.

तर, कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचं नेतृत्व नाराज असल्याचं दिसून आलं. भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्याला खतपाणी देण्याचं काम रामदास कदम यांनी केले असल्याचा आरोप झाला. इतकचं नाही तर रामदास कदमांची एक ऑडिओ क्लीप बाहेर आली होती. यात अनिल परबांवर जी कारवाई झाली त्यावर आनंद व्यक्त करताना दिसत होते. मात्र या ऑडिओ क्लीपमधील आवाज आपला नसल्याचा दावा रामदास कदमांनी केला.

दरम्यान, अलीकडेच दापोली नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने पक्षाची शिस्त पाळली नाही, असे कारण देत शिवसेनेच्या तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, चार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारळ देण्यात आलेले तीनही पदाधिकारी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले आहेत आणि नियुक्त झालेले चारही नवीन पदाधिकारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी जवळीक असलेले आहेत. या नव्या घडामोडींमुळे पालकमंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी रामदास कदम, योगेश कदम यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे, असे मानले जात होते.