काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा!: नाना पटोले

प्रदेश काँग्रेसकडून विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा व भारत जोडो यात्रेकरुंचा सत्कार.

मुंबई: भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा (Rahul Gandhi) संदेश पोहचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव करण्यासाठी आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, आ. प्रणिती शिंदे, खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, माजी केंद्री मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, यशोमती ठाकूर,डॉ. विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, वसंत पुरके, महिला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, एनएसयुआयचे आमीर शेख, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमाशाही कारभाराला देश कंटाळला आहे. भाजपा व मोदी कोणतेचे नियम कायदे पाळत नाही. खा. राहुलजी गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या संसदेतील भाषण वगळण्यात आले आहे. राहूल गांधी यांनी मोदी व अदानी यांच्या संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता पण मोदी सरकारने मनमानी पदधतीने त्यांचे भाषण कामकाजातून वगळून संसदेतच लोकशाहीचा खून केला. मोदी सराकरमध्ये शेतकरी, तरुण, छोटे व्यापारी, पत्रकार, प्रसार माध्यमांवर अत्याचार केले जात आहेत, त्यांना देशोधडीला लावले जात आहे. हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावा आणि भाजपा व मोदी सरकारच्या पापाचा पाढा वाचून दाखवा.
विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत आम्ही एकत्रच आहोत. मात्र नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपाने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले व माध्यमांनी त्याला हवा दिली.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळ म्हणाले की, भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतलेली आहे, एवढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. ही यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले व त्याचे कौतुक देशभर झाले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले. भाजपाचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहिल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण भारत जोडो यात्रेने जनतेच्या आशा काँग्रेसकडून वाढल्या आहेत. देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करु शकतो. काँग्रेस पक्षच आता आशेचा किरण आहे हा विश्वास वाढला आहे, असे थोरात म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. अमरावती व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे चव्हाण म्हणाले.

अमरावती पदवीधर मतदारंसघातून विजयी झालेले धीरज लिंगाडे व नागपूर शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले सुधाकार आडबाले यांचा सत्कार करण्यात आला तसेच राहुल गांधी यांच्या सोबत कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील भारत जोडो पदयात्रींचा गौरव करण्यात आला. या बैठकीची माहिती नंतर पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.