शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटनेने बी.आर.एस सोबत जावे – शिंदे

Nanded –  शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटना ही भारत राष्ट्र समिती सोबत येणाऱ्या काळामध्ये जावे आणि युती करावी अशी मागणीही रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

रयत क्रांती संघटना ही शेतकरी नेते, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य करत आहे. आणि भारत राष्ट्र समितीचे नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी हितासाठी कार्य करतात. त्यांनी तेलंगाना राज्यांमध्ये शेतकऱ्याचे हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

पांडुरंग शिंदे म्हणाले की,भारत देश स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव साजरा करत आहे. 75 वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर सर्व पक्षाच्या नेतेमंडळीने सत्ता भोगलेली आहे. त्यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, डावे ,उजवे या सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना भ्रमनिरास केला आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण निश्चित नसल्याकारणाने शेतमालाचे भाव  पाडले जात आहेत. कांद्याला भाव मिळू लागला की निर्यात बंदी करायचे. गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्याचा सोयाबीन घरामध्ये पडून आहे,कारण केंद्र सरकारने खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात केलेले आहे. कपासाची ही तीच परिस्थिती आहे. मुठभर व्यापारी संघटित होऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात यामध्ये शेतकऱ्याची माती होते. सोयाबीन ,कापूस, कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याला हा गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल भाव मिळत आहे.

राज्यामध्ये वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सरकारचं चुकीचं धोरण असल्यामुळे घडत आहे.  आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्यामध्ये चांगले काम केलेले मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांचा बी.आर.एस पक्ष हा म्हणतो आहे की, आपकी बार किसान सरकार. आज 75 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचे सरकार यावं अशी घोषणा के चंद्रशेखर राव करत आहेत .मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्याचे स्वागत करतो. आमचे नेते सदाभाऊ खोत यांना मी आवाहन करतोय आपली रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी लढाऊ संघटना आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये बीआरएस या पक्षासोबत जायला पाहिजे ही भावना मराठवाडा व विदर्भातील कार्यकर्त्याची, शेतकऱ्याची भावना आहे. भाऊंनी आता भाजपाची संगत सोडून देऊन शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षासोबत काम करावे अशी आम्ही मागणी करत आहोत.

शिंदे म्हणाले, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारणी पुण्यामध्ये होणार आहे .कार्यकारणी मध्ये आम्ही ही मागणी भाऊ कडे आणि वरिष्ठ नेत्याकडे करणार आहोत. भाऊंनी या आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा व येणाऱ्या निवडणुका बीआरएस सोबत लढवाव्यात . यावेळी पत्रकार परिषद रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम वडजे ,राहुल ढगे (जिल्हाध्यक्ष वाहतूक संघटना,विशाल  सरोदे, राजू हनुमंत, साहेबराव सोनकांबळे, मनोज नागठाणकर उपस्थित होते.