औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्याने पवार नाराज; थेट उद्धव ठाकरेंकडं दाखवलं बोट

संभाजीनगर : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचे संभाजीनगर व धाराशीव असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात असताना  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, किमान समान कार्यक्रमामध्ये हा मुद्दा नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतर मला समजले. पण एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम असतो. खऱ्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे, असं म्हणत पवार यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा (MVA) किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.