महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार …; पवारांच्या ‘त्या’ निर्णयानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.

१ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं.दरम्यान, या घोषणेनंतर आता राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यासाठी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.